बातमी कट्टा:- असे म्हटले जाते की,मृत्यू नंतर माणसाचे सर्व दुख संपत असते मात्र मृत्यूनंतर देखील नरक यातना भोगण्याची वेळ शिरपूर तालुक्यातील बोरगांव या गावाला आली आहे. स्वतंत्र्यकाळापासून आजपावेतो अमरधामच नसल्याने मोठी बिकट अवस्था निर्माण झाली आहे.आता तर चक्क गावात एखादी दुखद घटना घडली,निधन झाले तर पार्थिवावर दुसऱ्या गावाच्या शिवारातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करावे लागत आहे !
बोरगांव गावासाठी अमरधाम नसल्याने येथील नागरिक मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार हे जवळील अरुणावती नदीत करत होते.मात्र या नदी पर्यंत जाणाऱ्या रस्त्याची अवस्था पुर्णता बिकट होती.पावसाळ्यात तर मृतदेह जाळ्यासाठी मोठी कसरत करावी लागते.आणि आता तर नदीत जाण्यासाठी देखील योग्य रस्ता राहीलेला नाही. यामुळे शेजारच्या गावातील अमरधाम किंवा त्या गावाच्या नदीत अंत्यसंस्कार करावे लागण्याची मजबूरी गावकऱ्यांवर येऊन ठेपली आहे.
तालुक्यातील खेडोपाडी विकास पोहचला असे प्रत्येक वेळी म्हटले जाते मात्र बोरगावकरांच्या नशिबी मृत्यूनंतरचा प्रवासही कठीण असल्याचे चित्र आहे.यामुळे येथे सुखाने मरण्यासाठी कोणी स्मशान भूमी देता का ? स्मशान भूमी ?? असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे.