अवकाळीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीसाठी
सौ.अश्विनीताई पाटील थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
सरसकट पंचनामा करा आ. कुणाल पाटील
धुळे- अवकाळी आणि गारपिटीच्या दृष्टचक्रात सापडलेल्या बळीराजाच्या पाठीवर आधाराचा हात फिरवत डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम आज सौ. अश्विनीताई कुणाल पाटील यांनी केले. एखाद्या रणरागिणीप्रमाणे तत्काळ धाव घेत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. थेट शेतशिवार गाठत बांधावर जाऊन नुकसानीने खचलेल्या शेतक-याला धीर देत त्यांना पुन्हा नव्याने ऊभे राहण्याची उमेद त्यांनी दिली. दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर पडू न देता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन सौ. अश्विनीताई कुणाल पाटील यांनी दिले. महिलादिनी रणरागिनी बनून शेतकऱ्यांना ख-या अर्थाने धीर देण्याचे काम त्यांनी केले.

तर अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू झालेल्या बोरसुले ता. धुळे येथील शितल राकेश गिरासे यांच्या परिवाराची बोरसुले येथे जाऊन भेट घेतली व परिवाराचे सांत्वन केले. दरम्यान धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी आज अधिवेशनात आवाज उठवत सुरुवातीलाच पॉईंट ऑफ इंफॉर्मेशनचा मुद्दा घेत धुळे तालुक्यात झालेल्या नुकसानीचा तातडीने सरसकट पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली. दरम्यान आमदार कुणाल पाटील हे विधानभवनात शेतकऱ्यांसाठी लढत असून त्यांच्या पत्नी सौ.अश्विनीताई पाटील या थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीने खचलेल्या शेतकऱ्यांना धीर देत आहेत.
शेतकऱ्यांच्या आयुष्यातील दुर्दैवाचा फेरा कधी संपत नाही हे सत्य आहे, अशावेळी त्यांच्या संकटात धावून जात डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम सौ. अश्विनीताई कुणाल पाटील यांनी केले. दि.7 मार्च रोजी सायंकाळी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे निसर्गाने शेतकऱ्यांवर अचानक घाला घातला, शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. नुकसानीमुळे खचलेल्या शेतकऱ्याला आधार देण्यासाठी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या पत्नी सौ. अश्विनीताई कुणाल पाटील यांनी तातडीने शिरधाणे प्र.नेर, गोंदूर,कावठी,खंडलाय आदी भागांमध्ये जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी थेट काट्याकुट्यातून, चिखल मातीतून वाट काढीत त्यांनी नुकसानग्रस्त शिवार गाठले. महिलादिनी रणरागिनी बनून शेतकऱ्यांना ख-या अर्थाने धीर देण्याचे काम त्यांनी केले. आज दि.8 मार्च रोजी सकाळी शिरधाने प्र. नेर येथे जाऊन गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची सौ. अश्विनीताई पाटील यांनी पाहणी केली. यावेळी कांद्यासह गहू,हरभरा,भाजीपाला,पपई इतर पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नुकसानीच्या पाहणीप्रसंगी उपस्थित असलेले मंडळ अधिकारी, तलाठी, तसेच कृषी सहाय्यक आणि शेतकऱ्यांशी चर्चा करून शिरधाणेसह धुळे तालुक्यात झालेल्या नुकसानीचा सरसकट पंचनामा करून अहवाल शासनाला तातडीने पाठवण्याच्या सूचना केल्या. दरम्यान गारपीटीची अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती आमदार कुणाल पाटील यांना दिली असल्याचे सौ. अश्विनीताई पाटील यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करतांना सांगितले. अश्विनीताई पाटील यांनी नुकसानीची पाहणी केल्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाहणी दरम्यान सर्व अश्विनीताई पाटील यांच्यासोबत जि प सदस्य आनंद पाटील, मंडळ अधिकारी समाधान पाटील, तलाठी स्वप्नील शिंदे, कृषी सहाय्यक बोरसे, सौ.पुष्पाताई भदाणे, राजेंद्र पाटील, हिरालाल पाटील, गोरख पाटील, निसार पठाण, सुरीतराम पाटील,कन्हैयालाल भदाणे, गोरख भदाणे,ज्ञानेश्वर महाले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
अधिवेशनात आवाज
दरम्यान मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार कुणाल पाटील यांनी आवाज उठवत गारपीट व अवकाळीचा मुद्दा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे उपस्थित केला. यावेळी विधानभवनात बोलतांना आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले की, धुळे तालुक्यासह उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी गारपीट आणि अवकाळी पावसामुळे रब्बीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच बोरसुले ता.धुळे येथील महिलेचा अंगावर वीज कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून सरकारने विनाविलंब नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली. यावेळी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आमदार कुणाल पाटील यांनी मांडलेल्या मुद्द्याची सरकारने तातडीने दखल घ्यावी अशा सूचना दिल्या.