बातमी कट्टा:- विद्यालयाच्या इमारतीतील वरच्या मजल्यावर एका युवक आणि युवतीचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला.या गळफास मागे प्रेम प्रकरण असल्याचा संशय व्यक्त होत आहे.भीतीपोटी दोघांनीही दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.मात्र अंत्यविधीआधी दोघांचे विधीवत लग्न करण्यात आले आहे.मैत्रीदिनीच धक्कादायक घटना उघड झाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील वाडे येथील गावातील माध्यमिक विद्यालयाच्या नवीन इमारतीतील वरच्या मजल्यावर जिन्यात दोरीच्या सहाय्याने शनिवारी (दि. ३१ जुलै) एका प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मध्यरात्रीनंतर घडली असून, ती रविवारी सकाळी उजेडात आली.मुकेश कैलास सोनवणे वय 22 आणि नेहा बापू ठाकरे वय 19 अशी मृतांची नावे असून, दोघेही वाडे गावातील रहिवासी होते.
घटनेची माहिती प्राप्त झाल्यानंतर घटनास्थळी पोलीस पाटील अरविंद पाटील यांनी भडगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली व घटनास्थळी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे हे पोलीस कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवले.याप्रकरणी पोलीस पाटील अरविंद पाटील यांच्या माहितीवरून भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
पोलीसांना प्रथमदर्शनी सदर घटना प्रेमप्रकरणातून घडल्याचा संशय आहे.मृत मुकेश व नेहा हे एकाच समाजाचे असून, दोघांचे एकमेकांवर प्रेम होते.मात्र प्रेमाला मान्यता मिळणार नाही.या भीतीपोटी दोघांनी टोकाचे पाऊल उलचत जीवनयात्रा संपवली असावी, असा अंदाज पोलीसांकडून वर्तविण्यात येत आहे. मुकेश सोनवणे व नेहा ठाकरे यांनी प्रेम प्रकरणातूनच आत्महत्या केल्याची चर्चा असली तरी या घटनेमागील मुळ कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र दोघांच्या अंत्यविधीआधी विधीवत लग्न करण्यात आले.त्यामुळे मृत्यूनंतर दोघांची ईच्छा पुर्ण झाल्याची चर्चा आहे.पोलीसांकडून या प्रकरणात चहुबाजुंनी तपास सुरु आहे.