बातमी कट्टा:- घरातील मुलीचा सहा दिवसांत विवाह असल्याने घरात आनंदमय वातावरण होते.घराला नवीन रंगरंगोटी करण्यात आली होती. घरात बस्ता,सोने दागिने रोक रक्कम व लग्नासाठी लागणारे वस्तू खरेदी करुन ठेवले होते.मात्र आज सकाळी स्वयंपाक करत असतांना घरातील घरगुती गॅसचा अचानक भडका झाला आणि या घटनेत दोन्ही घर जळून खाक झाले.दोन्ही घरांचे लाखोंचे नुकसान झाले. सुदैवाने जिवीतहानी टळली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिंदखेडा तालुक्यातील दभाषी येथील रहिवासी छोटु भिका पाटील आणि दिलीप भिका पाटील या दोन्ही भाऊंंचे आजुबाजुला घर आहे. यात दिलीप पाटील यांच्या मुलीचा दि ३१ रोजी माळीच येथे विवाह आहे.यासाठी त्यांनी मुलीचा बस्ता,साड्या व रोख रक्कमसह ईतर वस्तू आणून ठेवल्या होत्या.तसेच कापूस देखील साठवून ठेवला होता.घरात लग्न असल्याने दोन्ही घरांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
मात्र आज घरातील महिला सकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास घरातील स्वयंपाकगृहात गेले असता तेथे अचानक गॅसने भडका घेतला.यावेळी दोन्ही घरातील घराबाहेर आल्यानंतर गॅसचा भडका होऊन संपूर्ण घराला आग लागली.दोन्ही घरांना आग लागल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात येईपर्यंत दोन्ही घर जळून खाक झाले.या आगीत घरातील संपूर्ण रोकडसह लग्नाचा बस्ता आणि ईतर संसारोपयोगी साहित्य जळून राख झाले.यात दोन्ही घरातील ६० हजार किंमतीचा लग्नाचा बस्ता, ९०हजार किंमतीचा कापूस, १ लाख ७० हजार किंमतीचे जिवनावश्यक वस्तू आणि पाच लाखांची रोख रक्कम जळूं राख झाली तर दुसऱ्या घरातील २ लाख ७० हजार किंमतीचे संसारोपयोगी साहित्य,तीन लाख १५ हजार किंमतीचा ३५ क्विंटल कापूस आणि ८० हजार रोख रक्कम जळून खाक झाली आहे. सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी झालेली नाही.