बातमी कट्टा:- राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना धान्य वाटप न करता स्वतः च्या आर्थिक फायद्यासाठी काळ्या बाजारात धान्य विक्री करणाऱ्या तालुक्यातील चांदपुरी येथील दुकानदारावर पुरवठा अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी शिरपूर तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक अधिकारी पी बी सोमलकर यांनी शुक्रवारी ३ सप्टेंबर रोजी दिलेल्या तक्रारीनुसार तालुक्यातील चांदपुरी येथे मन्सूर आरिफ मेमन याचे नावे रेशन दुकान क्रं ५० असून दुकानात ऑगस्ट महिन्याचे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना वाटपासाठी धान्य पोहच केले होते सदर रेशन हे 5 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट धान्य वाटप करणे अपेक्षित असतांना त्यांनी ते वाटप न करता काळया बाजारात विक्री केल्याची तक्रार प्राप्त झाल्याने दाखल तक्रारीची तहसीलदार आबा महाजन, पुरवठा अधिकारी मायानंद भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पुरवठा अधिकारी अपर्णा वडुडकर,पुरवठा निरीक्षक अधिकारी पी.बी.सोमलकर मंडळ अधिकारी,तलाठी यांनी शहानिशा केली असता दुकानातून 55 हजार 350 रुपये किमतीचे ३७ क्विंटल गहू,80 हजार 460 रुपये किमतीचा 26.82 क्विंटल तांदूळ,1 हजार 989 रुपये किमतीचे 66 किलो साखर असा एकूण 1 लाख 37हजार 790 रुपये किमतीचा 55 क्विंटल 16 किलो रेशन धान्य लाभार्थ्यांना वाटप न करता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी परस्पर काळ्या बाजारात विक्री केल्याचे आढळून आल्याने पुरवठा निरीक्षक अधिकारी पी बी सोमलकर यांनी दुकानदार मन्सूर आरिफ मेमन यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारी वरून शहर पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख करीत आहेत.