
बातमी कट्टा:- 10 नंबर चारीच्या जमिनीचा मोबदला शेतकर्यांना लवकरात लवकर मिळावा तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी मिळावे यासाठी सोमवारी दि. 28 मार्च रोजी सकाळी 11 वाजता शिरपूर येथील इरिगेशन खात्याचे उप अभियंता कार्यालयावर शेतकरी बांधव यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता.अभियंत्यांना जाब विचारला असता 15 दिवसात पूर्तता करणार असल्याचे अभियंता यांनी आश्वासन दिले.जर 15 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही तर सर्व शेतकऱ्यांसोबत उपोषणाला बसण्याचा यावेळी आमदारांनी इशारा दिला आहे.तसेच नवीन सर्वेनुसार दिला जाणारा मोबदला हा जुना दरा इतका मोबदला दिला जात असून त्यातही सुधारणा केली पाहिजे.असा आवाज यावेळी शेतकऱ्यांनी लावून धरला.

इरिगेशन खात्याच्या अधिकाऱ्यांच्या आडमुठे धोरणामुळे शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. अनेर प्रकल्पात / धरणात अब्जावधी लिटर पाणीसाठा उपलब्ध असून देखील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी सोडले जात नाही.
तसेच इरिगेशन खात्याचे कोणतेही अधिकारी शेतकऱ्यांकडे पाणी मागणीचे अर्ज घेण्याची तसदी देखील घेतली नाही. शेतकरी हिसाळे युनिटवर पाणीपट्टी भरण्यासाठी वणवण फिरतात.10 नंबर, 11, 13, 14 नंबर चारीच्या शेवटपर्यंत एकही थेंब पाणी आजपर्यंत पोहोचले नाही.सुरुवातीच्या 4 किलोमीटर पर्यंत अनेर मधून नाल्यावाटून परत नदीत पाणी वाया जाते, परंतु शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होत नाही.
डेप्युटी इंजिनिअर एच. जी. पाटील हे धुळ्याला राहतात, पूर्ण तालुक्याचे सेक्शन खाली पडलेले असते. अधिकारी बी. के. राजपूत म्हणतात माझ्याकडे हिसाळे भाग नंबर 1 आहे तर गवळी साहेब म्हणतात माझ्याकडे हिसाळे भाग नंबर 2 आहे. अधिकाऱ्यांमध्ये आपसात समन्वय नसल्याने शेतकर्यांचा खरीप हंगाम व रब्बी हंगाम मध्ये देखील पुरेसे पाणी मिळत नाही, ही शोकांतिका आहे. अधिकारी हे कार्यालयात बसून ज्याने पाणी घेतले नाही त्याला पाणी पट्टी पाठवतात व ज्याने पाणी घेतले त्यांना पाणीपट्टी पाठवत नाही असा अनागोंदी कारभार इरिगेशन खात्यामार्फत सुरू आहे.
2 मार्च 2022 रोजी शिरपूर तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीतज्ञ ऍड. बाबा पाटील यांच्यासह 10 नंबर चारीचे बाधित शेतकरी यांनी शेतीचा मोबदला मिळण्यासाठी संबंधित अधिकार्यांना प्रत्यक्ष अर्ज देऊन देखील शेतकरी लाभापासून वंचित आहेत. तसेच अनेर डॅम डेप्युटी इंजिनियर एच. जी. पाटील यांना मंगळवारी 22 मार्च रोजी पुन्हा अर्ज दिला असता यापूर्वी दिलेला अर्ज गहाळ झाला असे बेजबाबदार पणे उत्तर दिल्याचे शेतकरी बांधव सांगतात.
यापूर्वी 10 नंबर चारी मधून शेतीसाठी पाणी सोडण्याच्या मागणीसाठी अंगावर रॉकेल टाकणे, आत्मदहन करणे असे अनेक प्रकार शेतकरी बांधवांकडून घडले असून देखील अधिकारी अजूनही वटणी वर येत नाहीत, हा फार मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यापुढे कोणतीही जीवितहानी झाल्यास इरिगेशन खात्याचे संबंधित अधिकारी, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता हे जबाबदार राहतील व त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
10 नंबर चारीच्या जमिनीचा मोबदला शेतकर्यांना लवकरात लवकर मिळावा तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी मिळावे अशा मागणीचे निवेदन यावेळी देण्यात आले.शिरपूर येथील इरिगेशन खात्याचे उप अभियंता कार्यालयावर शेतकरी बांधव यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता.
यावेळी आमदार काशिराम पावरा,उपनगराध्यक्ष भुपेश पटेल, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, ऍड. बाबा पाटील, शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, संचालक अविनाश पाटील, धनराज मराठे थाळनेर, भरत मराठे थाळनेर, सर्जेराव पाटील थाळनेर, योगेश बोरसे उपसरपंच पिळोदा, भुलेश्वर पाटील मांजरोद, वासुदेव पाटले मांजरोद, अशोक रामकृष्ण पाटील भोरटेक, रघुनाथ पंढरीनाथ पाटील भोरटेक, दरबारसिंग बंजारा अजनाड, जनार्दन पाटील भाटपुरा, भटेसिंग राजपूत होळनांथे,अरमान मौले भावेर, दर्यावसिंग जाधव बभळाज व तालुक्यातील अनेक शेतकरी बांधव यांनी संबंधित निवेदन व इशारा दिला होता.
पाटबंधारे विभागातून कोणतेही प्रकारच्या हालचाली होत नसल्याने शेतकऱ्यांना पाटचारी असून देखील पाटाचे पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नापासून वंचित राहावे लागत असून यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात घट होत आहे. हे नुकसान संबंधित अधिकारी यांच्या पगारातून कपात करण्यात यावी.शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पाटबंधारे विभागाने संबंधित प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन पाणी सोडणे बाबत योग्य ती उचित कार्यवाही करावी व शेतकऱ्यांना भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला अदा करण्यात यावा अशा मागणी बाबत शेतकरी बांधव लढा देत आहेत.15 दिवसाच्या आत मोबदला मिळाला नाही तर पाटंबधारे कार्यालय बाहेर उपोषणाचा ईशारा आमदारांनी यावेळी दिला आहे.