
बातमी कट्टा:- मायलेकाची तापी नदीपात्रात उडी घेतल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली होती.आपल्या दहा वर्षाच्या मुलासोबत सासरवाडी येथे जात असतांना गिधाडे तापी नदीपात्रात उडी घेतल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात येत होते.घटनास्थळी शोधकार्य सुरु असतांना त्या महिलेचा मृतदेह सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास आढळून आला तर मुलगा मात्र अद्याप मिळुन आलेला नाही.मायलेकांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल का उचलले ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शिरपूर तालुक्यातील वाडी बु. येथील रविंद्रसिंग राजपूत हे पत्नी योगिताबाई रविंद्रसिंग राजपूत व दोन मुलांसोबत गुजरात येथे राहतात.योगीताबाई रवींद्रसिंग राजपूत वय 30 या काही दिवसांपासून आपल्या दहा वर्षीय मोठा मुलगा तेजेंद्र रविंद्रसिंग राजपूत याच्या सोबत माहेर शहादा तालुक्यातील डोंगरगाव येथे आले होते.

आज दि 16 रोजी सकाळी योगीताबाई रविंद्रसिंग राजपूत या आपल्या मुलासोबत डोंगरगाव शहादा येथून सासरी शिरपूर तालुक्यातील वाडी बु.येथे येण्यासाठी निघाले होते. योगीताबाई व तेजेंद्र यांंना घेण्यासाठी सासरे वाडी येथून वाघाडी फाटा येथे येऊन दोघांची वाट बघत होते. मात्र मायलेक योगीताबाई व तेजेंद्र दोघेही वाघाडी फाटा येथे न उतरता सरळ शिरपूर येथे उतरले व तेथून शिरपूर शिंदखेडा वाहनात बसून सुकवद फाटा येथे आले. योगिताबाई आपल्या तेजेंद्र मुलासोबत गिधाडे तापी पुलावर आले त्यांच्याकडे असलेली बॅग व चपल्ला पुलावर सोडून दोघांनीही तापी नदीत उडी घेतली.यादरम्यान महिला व एका लहान मुलाने तापीत उडी घेतल्याचे एकाने बघितले. तर बॅग मधील वहीवर लिहीलेले नाव मोबाईल नंबरने मायलेकांची ओळख समजली.

घटनेची माहिती सर्वत्र समजताच योगीताबाई यांचे नातेवाईक गिधाडे पुलावर दाखल झाले तर वाडी बु. नातेवाईक दाखल होऊन तापी नदीपात्रात मच्छीमारांच्या मदतीने शोध मोहीम सुरु केली.दुपारपासून सुरु असलेल्या शोध मोहीम नंतर सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास मयत योगीताबाई यांचा मृतदेह मिळुन आला मात्र मुलगा तेजेंद्र याचा सायंकाळी उशिरापर्यंत शोध लागला नव्हता.मयत योगीताबाई यांचा मृतदेह शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.योगिताबाई यांना दोन मुले असून तेजेंद्र हा मोठा मुलगा होता.
योगीताबाई यांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल का उचलले असावे ? मुलाला देखील सोबत घेऊन आत्महत्या करण्यासारखे ऐवढे मोठे कुठले संकट मयत योगीताबाई यांच्यावर उभे राहिले होते.असा प्रश्न सर्वत्र उपस्थित होत आहे. मात्र त्यांच्या मायलेकाच्या आत्महत्याच्या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
